-भारतातील सोशल मीडिया विश्वात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला आता मोठा धक्का बसला आहे. अवघ्या काही दिवसांत लाखो तरुणांचा पाठिंबा मिळवणाऱ्या या डिजिटल मोहिमेचं X (पूर्वीचं ट्विटर) हँडल भारतात बंद करण्यात आलं आहे. ही माहिती स्वतः या मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर दिली.
अभिजित दिपके यांनी पोस्ट करत लिहिलं, जशी अपेक्षा होती, तसंच झालं… कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट भारतात प्रतिबंधित करण्यात आलं आहे.
ही फक्त एका सोशल मीडिया पेजवरील कारवाई नाही; तर देशातील डिजिटल पिढीच्या वाढत्या अस्वस्थतेभोवती निर्माण झालेल्या चर्चेला मिळालेलं नवं वळण मानलं जात आहे. भारताची तरुणाई आज नेमकी काय विचार करते? तिला नेमकं काय हवं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे… ती एवढी अस्वस्थ का आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित एका विचित्र वाटणाऱ्या नावात दडलेली आहेत.
‘कॉक्रोच जनता पार्टी’.पहिल्यांदा हे नाव ऐकलं की हसू येतं. सोशल मीडियावरचा एखादा ट्रोल ट्रेंड असेल असं वाटतं. पण गेल्या काही दिवसांत जे घडलं, ते केवळ मीम कल्चर नव्हतं. तो होता देशातील लाखो तरुणांच्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या रागाचा, उपेक्षेचा आणि अस्वस्थतेचा डिजिटल स्फोट.
या संपूर्ण चर्चेची सुरुवात झाली भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर. युवक आणि ‘कॉक्रोच’ यांचा संदर्भ जोडणाऱ्या त्या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. नंतर स्पष्टीकरण देण्यात आलं, पण तोपर्यंत इंटरनेटवर एक नवा आवाज जन्माला आला होता. “What if all cockroaches come together?”हे वाक्य पोस्ट करणारा तरुण म्हणजे मूळचा छत्रपती संभाजीनगरचा अभिजित दिपके.
सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये शिक्षण घेणाऱ्या या तरुणाने सहज केलेली पोस्ट काही तासांत हजारो तरुणांच्या भावना बनली. कारण त्या एका वाक्यात आजच्या पिढीची वेदना दडलेली होती.
दोन दिवसांत पेजने मिळविले तब्बल 6.6 मिलियन (66 लाख) फॉलोअर्स-
अनेकांना सुरुवातीला हा एखादा मीम, ट्रोल ट्रेंड किंवा इंटरनेटवरील विनोद वाटला; पण अवघ्या दोन दिवसांत या पेजने तब्बल 6.6 मिलियन (66 लाख) फॉलोअर्स मिळविल्यानंतर देशभरात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या शर्यतीत हा ट्रेंड आता देशातील मोठ्या राजकीय पक्षांच्या डिजिटल उपस्थितीलाही आव्हान देताना दिसत आहे. सध्या भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया पेजला सुमारे 8.7 मिलियन, तर काँग्रेसला 13.2 मिलियन फॉलोअर्स असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय.हा फक्त इंटरनेटवरील व्हायरल ट्रेंड आहे की भारतात उभं राहत असलेलं नवं डिजिटल राजकीय आंदोलन?
एका पोस्टमधून उभा राहिला ‘डिजिटल पक्ष’-
अभिजित दिपके यांच्या मते, हा कोणताही पारंपरिक राजकीय उपक्रम नव्हता. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक साधी पोस्ट केली. मात्र त्या एका वाक्याने हजारो तरुण स्वतःला जोडू लागले.
यानंतर AI च्या मदतीने पोस्टर्स तयार करण्यात आले, सोशल मीडिया हँडल सुरू करण्यात आले आणि सदस्य नोंदणीसाठी वेबसाईटही तयार करण्यात आली. काहीच दिवसांत या मोहिमेने प्रचंड वेग घेतला. लाखो युवकांनी सोशल मीडियावर या ट्रेंडला पाठिंबा दर्शवला, तर हजारो जणांनी सदस्यत्वासाठी नोंदणी केल्याचाही दावा करण्यात आला.
विनोदामागे दडलेली गंभीर नाराजी-
पहिल्या नजरेत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हा संपूर्ण प्रकार विनोदी किंवा उपरोधिक वाटतो. “जर तुम्ही बेरोजगार असाल, सतत ऑनलाइन राहत असाल आणि व्यवस्थेने दुर्लक्षित केले असाल तर तुम्ही आमच्या पार्टीचे सदस्य आहात,” अशा शैलीतील पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या.मात्र या विनोदामागे खोल सामाजिक अस्वस्थता दडलेली असल्याचं निरीक्षकांचं मत आहे.
देशातील तरुणांमध्ये बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षा, आर्थिक अस्थिरता आणि राजकीय व्यवस्थेबद्दल वाढत चाललेली नाराजी या ट्रेंडमधून व्यक्त होत असल्याचं मानलं जात आहे. जेन-झी पिढीला आता केवळ धार्मिक किंवा जातीय मुद्द्यांवर आधारित राजकारण नको आहे; त्यांना रोजगार, तंत्रज्ञान, समान संधी, मानसिक आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा हवी आहे, असा सूर या मोहिमेतून उमटताना दिसतो.
सोशल मीडियापासून राष्ट्रीय चर्चेपर्यंत-
‘कॉक्रोच जनता पार्टी’ची चर्चा आता केवळ मीम्सपुरती मर्यादित राहिलेली नाही. विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञांनीही या ट्रेंडची दखल घेतली आहे. काहींनी याला तरुणांच्या नाराजीचा डिजिटल उद्रेक म्हटलं, तर काहींनी हा “NOTA चा नवा सोशल मीडिया अवतार” असल्याचं मत व्यक्त केलं.विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या ट्रेंडकडे केवळ विनोद म्हणून न पाहता भारतातील नव्या पिढीच्या मानसिकतेचा आणि डिजिटल असंतोषाचा चेहरा म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे.
आंदोलन की नवा सामाजिक संवाद?
या उपक्रमाला भविष्यात प्रत्यक्ष राजकीय स्वरूप मिळेल का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र अभिजित दिपके यांच्या मते, हा फक्त सुरुवातीचा टप्पा आहे. तरुणांनी संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून आपली नाराजी व्यक्त करावी, हा या मोहिमेचा मुख्य संदेश असल्याचं ते सांगतात.त्यांच्या मते, भारतातील युवक आक्रमक असला तरी लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. तो प्रश्न विचारेल, व्यवस्थेला जाब विचारेल, आंदोलन करेल; पण शांततामय मार्गानेच आपला आवाज उठवेल.
डिजिटल युगातील नव्या पिढीचा आवाज-
‘कॉक्रोच जनता पार्टी’ हा कदाचित अधिकृत राजकीय पक्ष नसेल; मात्र सोशल मीडियाच्या युगात एका साध्या पोस्टमधून देशव्यापी चर्चा कशी निर्माण होऊ शकते, याचं हे मोठं उदाहरण ठरत आहे.दोन दिवसांत 66 लाख फॉलोअर्सचा दावा, मोठ्या राजकीय पक्षांच्या डिजिटल ताकदीशी तुलना आणि युवकांचा प्रचंड प्रतिसाद या सगळ्यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट होत आहे :
भारताची तरुणाई फक्त मीम्स बनवत नाही, तर ती स्वतःचा आवाजही तयार करत आहे.
आज हा ट्रेंड इंटरनेटवर आहे; उद्या तो सामाजिक किंवा राजकीय बदलाचा चेहरा बनेल का?
सध्या तरी संपूर्ण देशाचं लक्ष ‘कॉक्रोच जनता पार्टी’कडे लागलं आहे.
— आरती सोनकांबळे








