नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. संख्याबळ कमी असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याऐवजी वास्तव स्वीकारावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी यांच्या आर्थिक विषयांवरील वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधींना सामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणींची जाणीव नाही. ते ऐश्वर्यात वाढले असल्याने देशातील आर्थिक वास्तव त्यांना समजणे कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीत विदर्भातील पाचही जागांवर महायुतीचा दावा-
अब्दुल सत्तार यांच्याबाबत सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांवर बोलताना बावनकुळे यांनी त्या केवळ अफवा असल्याचे सांगितले. सत्तार यांच्याशी नुकतीच चर्चा झाल्याचे नमूद करत त्यांनी महायुतीत कोणतीही गंभीर नाराजी नसल्याचा दावा केला.
विधान परिषद निवडणुकीत विदर्भातील सर्व पाच जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत बावनकुळे म्हणाले की, संख्याबळाचा विचार करता काँग्रेससमोर विजयाची शक्यता अत्यंत कमी आहे.
बिनविरोध निवडणुकीसाठी महायुतीचे प्रयत्न-
अपक्ष उमेदवारांशी चर्चा सुरू असून अनेक उमेदवार अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करत बावनकुळे म्हणाले की, ज्या ठिकाणी निकाल स्पष्ट दिसत आहे, तेथे बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अपक्षांनी माघार न घेतल्यास पक्ष नेतृत्व ठरवेल भूमिका-
काही उमेदवारांनी अर्ज कायम ठेवला तर त्याबाबत संबंधित पक्षांचे नेतृत्व निर्णय घेईल, असे सांगत त्यांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता फेटाळली. पुणे, नाशिकसह विविध ठिकाणांतील अपक्ष उमेदवारही अंतिम मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








