Published On : Sat, Mar 14th, 2020

यशवंत पंचायतराज अभियानात कामठी पंचायत समितीचा सन्मान

Advertisement

कामठी :-ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामाची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समित्यांना सन 2006 पासुन यशवंत पंचायत राज पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

नागपुर जिल्ह्यातुन सर्वाधिक गुणांसह विभागस्तरीय स्पर्धेसाठी कामठी पंचायत समितीने बाजी मारली होती. विभागस्तरीय समितीने मुल (चंद्रपुरात) व देसाईगंज (गडचिरोली) यांच्यानंतर तृतीय क्रमांकावर कामठी पंचायत समितीची निवड केली.

यशवंत पंचायतराज अभियान 2019 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाणारे विभागस्तरीय तृतीय पारितोषिक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा. ना. हसन मुश्रीफ साहेब (मंत्री, ग्रामविकास), मा. ना. अब्दुल सत्तार साहेब (राज्यमंत्री, ग्रामविकास) यांचे हस्ते गटविकास अधिकारी श्री. सचिन सुर्यवंशी व उपसभापती आशिष मल्लेवार यांनी स्वीकारले.

सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रूपये सहा लक्ष असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

कामठी पंचायत समितीला मागील सहा वर्षात तिसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे.

याकामी मा. संजय यादव सर (मुकाअ), मा. अंकुश केदार सर (उपायुक्त)मा. कमलकिशोर फुटाणे सर, (अति. मुकाअ), प्रकल्प संचालक मा. विवेक इल्मे सर, उपमुकाअ श्रीम. प्रमिला जाखलेकर मॅडम, राजेंद्र भुयार सर, अनिल किटे सर, जिल्हा परिषदेचे सर्व मा. विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, पंचायत समिती कामठी च्या सभापती अनिता रमेश चिकटे, उपसभापती देवेंद्र उर्फ बाळू गवते, सभापती उमेश रडके, जी प सदस्य अवंतीकाताई लेकुरवाडे, जी प सदस्य अनिल निधान, जी प सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य मोहन माकडे यासह पंचायत समिती च्या आजी माजी सदस्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या गौरव ग्रंथाच्या मुख/मलपृष्ठावर कामठी तालुक्यातील काही निवडक कामांची छायाचित्रे आहेत.

📌आयएसओ नामांकन मिळविणारी नागपुर जिल्हयातील पहीली पंचायत समिती.

📌 केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रभावी अभिसरण.

📌 सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या वाॅटर एटीएमचे महिला बचत गटांमार्फत यशस्वी संचलन.

📌 स्वच्छ भारत मिशन या केंद्र सरकारच्या योजनेचा अत्यंत प्रभावी प्रचार आणि प्रसार.

📌 वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील ग्रामपंचायतींची घनकचरा व्यवस्थापनाकडे आश्वासक वाटचाल.

📌 जिल्हा परिषद शाळांमध्ये पारंपरिक अध्यापनाबरोबरच डिजीटल साधनांचा सुयोग्य वापर.

📌अद्ययावत अभिलेख कक्ष.

पंचायत समिती ही एक प्रकारे तालुक्याचे मिनी मंत्रालय आहे. सरकारच्या लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी सक्षमपणे व्हावी यासाठी क्षेत्रीय कर्मचा-यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न याद्वारे सफल झाला आहे. पुरस्काराची परंपरा कायम राखल्याचा आनंद आहेच. अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय साधून तालुक्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करू.

संदीप कांबळे कामठी