नवी दिल्ली : चार वर्षाच्या कार्यकाळात आपल्या खात्याच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने पीयूष गोयल यांना रेल्वेतील समस्या व त्यावरील उपाययोजनांसंदर्भातील एक पत्र दिलं. त्यावर पीयूष गोयला यांनी पत्रकाराला एक प्रस्ताव दिला. एक दिवस रेल्वे मंत्री बनण्याचा हा प्रस्ताव होता. ते म्हणाले की, नायक सिनेमाप्रमाणे तुम्ही माझ्याजागी रेल्वे मंत्री बना आणि स्वतःचे नियम-कायदे लागू करा. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मस्करीत हे वक्तव्य केलं नाही तर, रेल्वे बोर्डाच्या चेअरमॅनला एक मॉक इव्हेन्ट करायची सूचनाही दिली.
दरम्यान, पीयूष गोयल यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्दयावर मतं मांडली. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा कदापि विचार नाही व भविष्यातही असणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही गोयल यांनी दिली.आधुनिकीकरण व नवे तंत्रज्ञान यासाठी रेल्वे खासगी व विदेशी कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर मदत घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या खासगीकरणाची भीती रेल्वे कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली.
मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादनात येणाऱ्या अडचणी चर्चेतून लवकरच दूर होतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. ‘राजधानी’ गाडी सुरू केली तेव्हाही असाच विरोध झाला होता, याचे स्मरण देऊन काही मंडळींना रेल्वेची तांत्रिक प्रगती नकोशी व्हावी हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.