Published On : Mon, Jun 11th, 2018

शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

Advertisement

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. धमकीचे पत्र म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचं विधान शरद पवार यांनी रविवारी (10 जून) केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत टीकास्त्र सोडले आहे.

”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी!. पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही! पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य बाहेर येईलच”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?
कोरेगाव-भीमा प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंबेडकरी चळवळीतील 5 जणांना अटक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले. पुणे शहरात पुरोगामी विचारांचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एल्गार परिषद भरवली. तर त्यांना नक्षलवादी ठरवतात. कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केला, हे सगळ्या जगाला माहीत आहे. तरी सत्तेचा वापर करून विनाकारण लोकांना गोवले जात आहे. मात्र, आता या सरकारला लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही. धमकीचे पत्र कोणी जाहीर करीत नाही. केवळ लोकांची सहानभूती मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हणत पवार यांनी शंका उपस्थित केली.

मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही!
पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य बाहेर येईलच

”परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र यावे”
मी देशाच्या सर्व राज्यात जातो. आता देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यास तयार आहेत. सगळ्यांची एकत्रित येण्याची मानसिकता आहे. ही शक्ती उभी करून देशातील जनतेला पर्याय देऊ, असे आवाहनही यावेळी पवार यांनी केले.