Published On : Fri, Aug 21st, 2020

देशात महामार्ग निर्मितीसाठी आधुनिक आणि हरित तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश

Advertisement

-ना. नितीन गडकरी यांनी घेतला रस्ते बांधकामाचा आढावा
-‘हरित पाथ’ मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभ
-महामार्ग बांधकामात 25 टक्के खर्च बचतीची सूचना

नागपूर: देशातील महामार्ग निर्मितीसाठी आधुनिक आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक आणि परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आज दिले. याचवेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने रस्ते बांधकामात 25 टक्के खर्च बचत करण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत नवीन हरित महामार्ग धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. बांधकाम करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम खर्चात 25 टक्के बचत करण्याचे मिशन आहे असल्याचे ना. गडकरी या बैठकीत म्हणाले. यावेळी ‘हरित पाथ’ या मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. या अ‍ॅपच्या माध्यमातून वृक्षारोपण जिओ टॅगिंग करून करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप राष्ट्रीय महामार्ग प्रााधिकरणाने विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रत्येक झाडाची देखरेख ठेवली जाणार आहे. झाडाची वाढ, देखभाल दुरुस्ती अशा सर्व सुविधा या अ‍ॅपमार्फत मिळणार आहे. वृक्षारोपणानंतर रोपण करण्यात आलेल्या झाडाची देखभाल ही गांभीर्याने केली गेली पाहिजे, असे सक्त आदेशही ना. गडकरी यांनी यावेळी महामार्ग प्राधिकरणाला दिले.

महामार्गांवर करण्यात येणार्‍या वृक्षारोपण आणि देखभाल दुरुस्ती व झाडांची निगा राखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात यावे. किंवा खाजगी एजन्सीला हे काम भाड्याने देण्यात यावे. या कामात गैरशासकीय संघटनांची मदतही घेता येईल, असे ना. गडकरी म्हणाले. महामार्गांवर वृक्षारोपणाचे देण्यात आलेले लक्ष्य मार्च 2022 पर्यंत 100 टक्के पूर्ण करण्यात येईल आणि झाडांची निगा राखण्याचे कामही तंतोतंत केले जाईल, असे आश्वासन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले.

महामार्गावर बांधकामात येणार्‍या झाडांचे प्रत्यारोपण करून झाडे वाचविणे आमचे मिशन असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- झाडांची काही प्रमाणात कापणी करण्यासाठ़ी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करावा. यासाठी मशिनरी भाड्याने घेण्याची गरज असेल तर घेण्यात यावी. तसेच रस्ते बांधकाम करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम खर्चात 25 टक्के बचत करणे आवश्यक आहे. टेकडीवरील रस्ते, सीमा भागातील रस्ते आणि समुद्राजवळील रस्त्यांसाठी वेगळे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. अंदमान आणि निकोबार येथे रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा उदाहरण म्हणून भविष्यात वापर केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.