नवी दिल्ली : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या नियुक्त्या करण्यासंदर्भातले निर्देश दिले . राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेपाटपाची चर्चा असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विधान परिषदेत कोणत्या नेत्याला संधी मिळणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी राज्यात भगतसिंह कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल होते. मात्र, महाविकास आघाडीकडून राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या १२ व्यक्तींच्या यादीवर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. अनेक महिने या नियुक्त्या रखडल्या होत्या.
आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. लं. यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर या सदस्यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवर न्यायालयाने स्थगिती आणली होती. अखेर आज ती स्थगिती उठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला असल्याने ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.









