Published On : Fri, Jan 21st, 2022

असंवेदनशील महानगरपालिका– राजेश बोढारे

Advertisement

दिव्यांगाचा आंदोलनाची साधी दखल सुद्धा नाही.

दिव्यांग व्यक्तींना सुद्धा समाजात ताठ मानेने जगता यावे याकरिता शासनाने १९९५ च्या कायदा पारित करुन दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ५% निधीची तरतूद केलेली आहे. या निधी अंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या खात्यात थेट निधी जमा करण्याचा नियम आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेने अद्याप मागील ४ वर्षपासून कोणत्याही प्रकारची निधी दिव्यांगांना मिळालेला नाही. याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांती मोर्चा तर्फे अनेक वेळा निवेदन महापालिका प्रशासनाला दिले परंतु महानगर पालिकेच्या कामकाढु धोरणामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाही करण्यात आली नाही.

प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर व प्रहार अपंग क्रांती मोर्चा तर्फे संविधान चौक येथे मागील सात दिवसांपासून दिव्यांग व्यक्तींच्या हक्का करिता प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष राजेश बोढारे हे दिव्यांग बांधवांसह ठिय्या आंदोलनावर बसले आहे. परंतु असंवेदनशील महानगरपालिकेच्या एकाही अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळाला भेट सुद्धा दिली नाही किंवा साधी दखल सुद्धा घेतली नाही. कडक थंडीत दिव्यांग आंदोलन करीत आहे परंतु महानगर पालिका मात्र अजूनही निद्रा अवस्थेत आहे.

आपल्या वक्तव्यात शहर अध्यक्ष राजेश बोढारे यांनी सांगितले की, मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे नागपूर महानगर पालिकेने आपल्या असंवेदनशीलतेचा व हेकेखोरपणाचा परिचय दिला आहे. जर उद्या पर्यंत दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही तर नागपूर महानगर पालिका आयुक्त व महापौर यांच्या दालनात दिव्यांग व्यक्ती आंदोलन करतील. व याची सर्वस्वी जबाबदारी मनपा ची राहील.

या आंदोलनात प्रमुख रूपाने कार्यध्यक्षा शबिना शेख, अरमान खान, प्रवीण हातमोडे, अपंग क्रांती अध्यक्ष उमेश गणवीर, धरम पडवार, ज्योती बोरकर, चंद्रिका रॉय, संजय पांडे, सुनील ठाकूर,बाळू मांडोकार व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.