पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळ कुंडमळा येथे रविवारी एक भीषण दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील जुना पूल अचानक कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला असून, २० ते २५ जण नदीत वाहून गेल्याची भीती आहे.
दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुट्टीचा दिवस असल्याने पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. पूर आलेल्या इंद्रायणी नदीचा प्रवाह जोरात असल्याने अनेकजण थेट पाण्यात कोसळले. वाहून गेलेल्या लोकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. अजूनही काहीजण अडकल्याची शक्यता आहे.
या पुलाची अवस्था जीर्ण होती आणि प्रशासनाकडून कोणतीही दक्षता घेण्यात आलेली नव्हती. ना डागडूजी, ना इशारे यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित होतो.
पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ही दुर्घटना निसर्गाच्या रौद्ररूपाबरोबरच मानवी निष्काळजीपणाचीही आठवण करून देते.