Published On : Wed, May 24th, 2017

शहरात नियमित पाणी पुरवठ्यासाठी टॅंकरची संख्या वाढवा : संदीप जोशी

Advertisement


नागपूर
: उन्हाळ्यात नागरिकांना आवश्य़क पाणी पुरवठा व्हावा, याची काळजी ओसीडब्ल्यूने घ्यावी. सध्या गरज असलेल्या मनपाच्या झोनमध्ये टॅंकरची संख्या वाढवावी असे निर्देश सत्तापत्र नेते संदीप जोशी यांनी दिले.

बुधवारी (ता. २४) रोजी मनपा मुख्यालयात जलप्रदाय समिती आढावा बैठक पार पडली. प्रामुख्याने जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, उपसभापती महेंद्र धनविजय, सदस्य दीपक चौधरी, नगरसेवक विजय झलके, ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, संचालक मानवसंसाधन व जनसंपर्क केएमपी सिंग, राजेश कालरा आणि मनपाच्या प्रतिनिधी मंडळाची उपस्थिती होती.

येत्या १५ दिवसांपर्यंत अत्यावश्यक असलेल्या मनपाच्या झोनमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकरची संख्या वाढवावी, नवेगाव खैरी येथे सुरू असलेल्या ट्रिपींग टाळण्याच्या सूचनाही महाराष्ट्र विद्युत राज्य मंडळाला देण्याचे निर्देश यावेळी सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिले. नागरिकांनीही फक्त पिण्यासाठीच मनपा-ओसीडब्ल्यूद्वारे पुरविण्यात येणारे पाणी वापरावे. घरगुती वापराचे पाणी बोअरवेल, विहिरी आदी माध्यमातून घेतल्यास शहरात आवश्यक भागात या शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येईल, असे आवाहन जलप्रदाय विशेष समिती सभापती राजेश घोडपागे यांनी केले.

ओसीडब्ल्यूकडून टँकरने पाणी पुरवठा करताना अनियमिततता असल्याचे अनेक नगरसेवकांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. यावर कर्मचारी सुटीवर असणे, टँकर दुरुस्ती आदी कारणांमुळे पाणी पुरवठा खंडित होत असल्याचे ओसीडब्ल्यू प्रतिनिधींनी सांगितले. यावर गरज असलेल्या भागांतील टँकरची संख्या वाढवावी, अशा सूचना करण्यात आल्या. उन्हाळ्यातील शेवटच्या १५ दिवसांच्या पाणी पुरवठ्याचे आव्हान यंत्रणेसमोर असून नागरिकांची गैरसोय टाळून योजनाबद्ध पद्धतीने पाणी पुरवठा करावा, असे निर्देश यावेळी ओसीडब्ल्यूला देण्यात आले.