Published On : Sat, Aug 3rd, 2019

उमरेडमध्ये ७४ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या लंपास

Advertisement

नागपूर: उमरेड परिसरातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून महावितरणच्या वीज वाहिन्यांना लक्ष केले आहे. वर्षभराच्या कालावधीत चोरटयांनी सुमारे ७४ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या लंपास केल्या आहेत. लंपास केलेल्या वीज वाहिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. परिणामी परिसरात अखंडित वीज पुरवठा करण्यास महावितरण प्रशससानास अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची विनंती महावितरणकडून उमरेड पोलीसांना करण्यात आली आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीज चोरांनी उमरेड शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी किन्हाळा,शिरपूर, मकरधोकडा , उकरवाही, हेटी, हातकवडा, पाहमी, चारगाव , कळमना, उदासा, सेलोटी , बोरादाखल, गौवसि, शेडेश्वर, ठोंबरा, कातगाव , गावसुत, बोर्डकला, वासी, या सह एकूण २६ ठिकाणी चोरटयांनी आपला कार्यभाग साधला आहे. महावितरणच्या उमरेड ग्रामीण शाखा कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या या गावात चोरटयांनी मे-२०१८ पासून चालू वीज वाहिन्यांवरी वीज प्रवाह बंद करून ऍल्युमिनियमच्या वाहिन्या लंपास केल्या आहेत.

चालू वीज वाहिन्यांशी खेळणे हे जीवावर बेतू शकते याची जाणीव असताना देखील जीव धोक्यात घालून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याने महावितरणला या भागात वीज पुरवठा करण्यास अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

चोरटयांनी वीज वाहिन्या लंपास केल्यावर पुन्हा नवीन साहित्याची जमवाजमव करण्यात वेळ जातो आणि परिणामी बराच काळ वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागते. प्रसंगी वीज ग्राहकांचा रोषही स्थानिक जन्मित्रांना पत्करावा लागतो.

या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन महावितरणच्या उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी उमरेड पोलिसांना दिले आहे. दीड कोटी रुपयांची वीज वाहिनी चोरीला गेल्याने महावितरणला या भागात नवीन वीज वाहिनी टाकण्यासाठी पुन्हा तेवढ्याच किमतीची नवीन वीज वाहिनी टाकावी लागली आहे.

उमरेड ग्रामीण भागातील निर्जन स्थळी वीज वाहिनीजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्यास नागरिकांनी जवळच्या महावितरण कार्यालया किंवा पोलीस स्थानकास माहिती देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.