नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याप्रकरणी काँग्रेसने दोन नेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शैलेश अग्रवाल आणि यवतमाळ मतदारसंघातील साहेबराव कांबळे यांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आले आहे.
विधान परिषद निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अरुण लखानी आणि दुष्यंत चौधरी यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडीनंतर काँग्रेस नेतृत्वाने प्रकरणाची गंभीर दखल घेत शिस्तभंगाची कारवाई केली.
पक्षाच्या अधिकृत निर्णयाविरोधात जाऊन उमेदवारी मागे घेणे हे संघटनात्मक शिस्तीचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. निवडणुकीत पक्षाला राजकीय नुकसान पोहोचवल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून काँग्रेसच्या या कठोर भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.








