अमरावती : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवारांनी शिंदे आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. तसेच सरकारमधील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला आहे. यापार्श्वभूमीवर अपक्ष आमदार बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळीही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण ११ वाजता निर्णय जाहीर करणार असे म्हटले होते. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली . गेल्या अर्ध्या तासात मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार फोन आल्याचे त्यांनी सांगितले.
मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण गेल्या मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत. त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यांनी १७ तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर १८ तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असे ते म्हणाले आहेत.त्यामुळे मी १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करेन, असे कडू यांनी जाहीर केले.
तसेच बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे. मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.