Published On : Wed, Oct 31st, 2018

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा शुभारंभ

Advertisement

मुंबई : लोहपुरुष, देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफार्मिंग आर्ट्स) येथून राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, आमदार राज पुरोहित, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, वन विभागाचे सचिव विकास खारगे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता व अखंडतेची शपथ दिली.

एकता दौडमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचे कर्मचारी, विल्सन कॉलेजचे विद्यार्थी, स्काऊट गाईडसह क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक आणि बालकांपासून वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते. सर्वजण उत्साहाने दौडचा आनंद घेत होते.

राष्ट्रीय एकतेचा संदेश नृत्यातून सादर केल्याबद्दल एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना मुख्यमंत्री श्री. फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या एकता दौडचा समारोप मरीन ड्राईव्ह येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखाना येथे झाला.