
मुंबई : राज्यात वाढत्या उष्णतेदरम्यान हवामानात अचानक बदल होत असून, अवकाळी पावसाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. पावसाळा दूर असतानाही पूर्वमोसमी पावसाची सक्रियता वाढली असून, हवामान खात्याने गुरुवार (19 मार्च) रोजी राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मध्य प्रदेशाच्या आसपास चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या प्रणालीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी, वातावरणातील आर्द्रता वाढून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. यात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, ठिकठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः नाशिक आणि घाटमाथ्याच्या भागांसाठी हा इशारा अधिक गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच नागपूर, अकोला, अमरावती आणि गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भातही यलो अलर्ट लागू असून, या भागांत 30 ते 50 किमी वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचे वातावरण तयार होत असताना दुसरीकडे तापमानातही वाढ कायम आहे. 18 मार्च रोजी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अमरावती आणि वर्धा येथे 39.4 अंश, तर सोलापूर आणि यवतमाळमध्ये 39 अंश तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथील कृषी महाविद्यालय परिसरात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.








