कचरा विलगीकरण करण्याबाबत जनजागृती : सुयोगनगरातील नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ
नागपूर: आज कचऱ्याची समस्या विकासामध्ये अडथळा निर्माण करीत आहे. मात्र या कचऱ्याचे योग्य संकलन व योग्य विल्हेवाट लावल्यास त्यामधूनही विकास साधता येऊ शकतो. केंद्र सरकारने स्वच्छतेला प्राधान्य देतस्वच्छ भारत मिशन सुरू केले. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता ही आपली जबाबदारी समजणे आवश्यक आहे.
कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ओला व सुका कचरा विलगीकरण प्रक्रियेला सुरुवातकरण्यात आली आहे. घरा घरातील कचरा संकलीत करताना एक दिवस फक्त ओला व एक दिवस फक्त सुका कचरा संकलीत केला जावा. ओला सुका कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगरसेविका व महिला व बालकल्याण समिती उपसभापती विशाखा मोहोड यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन २०१९ अंतर्गत शनिवारी (ता.24) धंतोली झोनअंतर्गत सुयोगनगरातील नागरिकांनी स्वच्छेतेची व कचरा विलिगीकरणासंदर्भात शपथ घेतली. यावेळी प्रभागातील नगरसेवक संदीप गवई, नगरसेविका विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, धंतोली सहायक आयुक्त स्मिता काळे, स्वच्छ मंच या संस्थेच्या अनसूया छबानी, कांचन सातपूते, झोनल अधिकारी राजेश गायकवाड, स्वास्थ निरिक्षक राजेश नागपूरे, राजेश गायधने, सुरेश दामनकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना विशाखा मोहोड म्हणाल्या, ओला कच-यापासून खत निर्मिती तयार करता येते. सुका कचरा हा भंगार उपयोगी स्वरूपाचा असतो. ओल्या कच-याला घरच्याच एका कुंडीत साठवले तर आपण त्यापासून खतनिर्मिती तयार करू शकतो. यावेळी कच-यापासून खत निर्मिती तयार करण्याची माहिती अनसूया छबाणी यांनी दिली. यावेळी परिसरातील नागरिकांनी आपण कचरा विलगीकरणासंदर्भात शपथ घेतली.