Published On : Fri, Apr 17th, 2020

रेशनिंगचे धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी – अजित पवार

Advertisement

सर्व पालकमंत्र्यांना अजित पवारांचे आवाहन…

मुंबई : कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानातून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावे, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचे तात्काळ निराकरण करावे आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशनदुकानांमधून पुरेसे अन्नधान्य उपलब्ध केले जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधले आहे. शिवाय शासनाने रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे.

राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा ३.८७ लाख मेट्रीक टनांवरुन ७.७४ लाख मेट्रीक टनावर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना १.५२ लाख मेट्रीक टनाचे अतिरिक्त धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गरीब नागरिकांना पुरेसे धान्य मिळावे, धान्याचे, सुरळीत वाटप व्हावे, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालावे आणि अन्नधान्य वाटपातील तक्रारी दूर करण्याची जबाबदारी घ्यावी असेही अजित पवार यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सर्वस्तरावर उत्तम काम करत असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ७ कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानावरुन देण्यात येत आहे. केंद्रसरकारकडून जाहीर झालेल्या ५ किलो मोफत तांदळाचे वाटपही सुरु आहे. ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्यांच्यासाठी ८ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरु असून काही जिल्ह्यामधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गरीबांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य सुरळीत व विनातक्रार मिळेल हे सुनिश्चित करावे. संबंधित पालकमंत्र्यांनी यात व्यक्तीश: लक्ष घालावे, अशी आवाहनवजा विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना केली आहे.

शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर १८००२२४९५० आणि १९६७ हे टोलफ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.