Published On : Sat, Jul 27th, 2019

स्वच्छता अभियानातर्गत ग्रामपंचायतींना ७ लाखाचे बक्षिस

Advertisement

प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला प्रशस्तीपत्र

गावात छतावरील पाण्याचे पुनर्भरण,विहिरी तलाव खोलीकरण,स्वच्छता व शौचालयाचा वापर करून स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करने काळाची गरज-गटविकास अधिकारी बाळकृष्ण यावले यांचे प्रतिपादन.

रामटेक : संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९ अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील उत्कृष्ट प्रभाग व ग्रामपंचायतींना उमरी, चिचाळा, बोरडा, पथरई, खनोरा ग्रामपंचायत पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत .कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छता अभियानातर्गत ग्रामपंचायतींना ७ लाखाचे बक्षिस वितरित करण्यात आले. तर प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला प्रशस्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे . पंचायत समिती रामटेक अंतर्गत स्व.घनश्यामराव किंमतकर सभागृह, रामटेक येथे आयोजित सत्कार सोहळ्याला गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी भौतिक विकासापेक्षा मानव विकासाला प्राधान्य द्यावे व वृक्षारोपण,जलसंधारणासारख्या कामांमधून गावाचा शाश्वत विकास करावा तसेच वृक्षलागवड,त्यांचे संवर्धन करणे तसेच सरपंच व ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना गावाच्या विकासाकडे विशेष लक्ष देतांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून आरोग्याकडे वाटचाल करावी.

गावात छतावरील पाण्याचे पुनर्भरण,विहिरी तलाव खोलीकरण,स्वच्छता व शौचालयाचा वापर करून स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी केले.नागरीकांनीही शासनाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या स्वच्छताविषयक योजना व उपक्रमांना सहकार्य करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक मते, तालुका आरोग्य अधिकारी नाईकवार, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कर्नेवार, अधिक्षक अनिल मडावी,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण, क्रुषी विभागाचे विस्तार अधिकारी चन्ने, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी कुबडे ,शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कुवारे आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याकरीता तालुक्यात उत्कृष्ट प्रभाग स्पर्धा तसेच तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत निवडून त्यांचा प्रमाणपत्र व रोख बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ४५ ग्रामपंचायतीतून ४५ उत्कृष्ट प्रभागांना प्रत्येक दहा हजार रुपये व उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून उमरी, चिचाला बोरडा, पथरई, खनोरा येथील सरपंच तथा ग्रामसेवकांना ५० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. असे एकूण ७ लाख रुपयांची बक्षिसे वितरीत करण्यात आली.

सोबतच सदर निवडलेल्या प्रभागातील प्रत्येक कुटूंब प्रमुखाला एक प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाकरीता सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश चौधरी तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, गट समन्वयक व समूह समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रकुमार बोरकर यांनी केले.शिक्षण विस्तार अधिकारी श्यामसुंदर कुवारे यांनी आभार मानले.