
नागपूर : उसरबरसे बंधूंवर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपी विजयेंद्र मनोहर गोराडे आणि सतीश मनोहर गोराडे यांची नागपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी हा निकाल दिला.
प्रकरणानुसार, 4 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दसरा रोड स्वीपर कॉलनी परिसरात करण उसरबरसे आणि भीमसेन उसरबरसे या दोन्ही भावांवर तीक्ष्ण शस्त्रे आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणात विजयेंद्र गोराडे, सतीश गोराडे यांच्यासह निलेश पसेरकर आणि विजय तायडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, सरकारी संडासाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उसरबरसे बंधूंनी महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्याच रागातून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. करण उसरबरसे हे रात्री टॅक्सीने घरी आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या भीमसेन उसरबरसे यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन कोतवाली पोलीस निरीक्षक प्रदीप रायान्नावार यांनी केला होता. न्यायालयात दोन्ही जखमी भावांसह एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
सरकारी पक्षातर्फे एपीपी राम अनवाणे यांनी जखमी साक्षीदारांच्या साक्षींवर विश्वास ठेवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तर बचाव पक्षाचे वकील ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी जखमींच्या साक्षींमध्ये विसंगती असल्याचा दावा केला. तसेच वैद्यकीय अहवालात चाकूच्या जखमांचा उल्लेख नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, जखमी बंधूंवर आधीपासून फौजदारी गुन्हे दाखल असून त्यांचे अनेक शत्रू असू शकतात. तसेच घटनास्थळी इतर स्वतंत्र साक्षीदार नसल्यामुळे आरोपींना केवळ संशयावरून गोवण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, खटल्यादरम्यान आरोपी निलेश पसेरकर आणि विजय तायडे यांचा मृत्यू झाला होता.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती विचारात घेत न्यायालयाने विजयेंद्र आणि सतीश गोराडे यांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले.







