नागपूर: तेलीपुरा-तांडापेठ येथील नाईक तलाव सौंदर्यीकरणात जी घरे जात आहेत त्या लोकांचे व अन्य विकास प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन नारा-नारी येथे करण्यात आले आहे. तेथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वाटपपत्र बुधवारी (ता. २३) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते महापौर कक्षात नागरिकांना वाटप करण्यात आले.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत शहरी गरीब नागरिकांना मुलभूत सुविधा या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पानुसार नारा नारी या वस्तीत सदर घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी एकूण २५ चौ.मी. (२६९ चौ. फूट) चटई क्षेत्राच्या बांधकामात एक बैठक खोली, एक शयन कक्ष, एका स्वयंपाकाच्या खोलीसह शौचालय व स्नानगृह इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत ५० टक्के वाटा केंद्र शासन, ३० टक्के वाटा राज्य शासन तर उर्वरीत वाटा महानगरपालिका व लाभार्थ्याला उचलावा लागतो.
बुधवारी महापौर कक्षात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नागपूर महानगरपालिकेअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने घरकुल वाटपपत्र प्रदान करण्यात आले. नाईक तलाव परिसरातील विकास कामासाठी बाधित झालल्या ७१ कुटुंबांपैकी ४० पात्र लाभार्थ्यांना तसेच इंदिरा नगर नाला परिसरातील दोन, संजय गांधी नगर नाला परिसरातील आठ, भीमरत्न नगर परिसरातील १० व बोरियापुरा येथील एक अशा एकूण ६१ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपअभियंता आर.जी. राहाटे, उपअभियंता पंकज पाराशर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात लक्ष्मी वासुदेव खंडारे, मोगरा मुरली साहू, पंढरी कृष्णा पिंपरीकर, राधाबाई चंद्रशेखर सावरकर, अन्नपूर्णा अन्नाजी चांदेकर, लिला पंढरी हेडाऊ, दामू महालू सोनकुसरे, नैनाबाई सिन्हा, कलाबाई खापेकर, मालाबाई बन्सोड, आशा कुशाल कांबळे, कल्पना प्रकाश ढवळे यांना घरकुल वाटपपत्र देण्यात आले.