
चंद्रपूर : देशात घरगुती गॅसबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी नागरिक गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र केंद्र सरकार आणि पेट्रोलियम विभागाने देशात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विरोधकांकडून केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका होत असताना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसवर अफवा पसरविण्याचा आरोप केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेससह काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करत आहेत. अफवा पसरवून नागरिकांना गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार, पेट्रोलियम मंत्रालय आणि गॅस कंपन्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की देशात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांना जितकी गरज आहे तितका गॅस उपलब्ध करून दिला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, गॅस एजन्सीसमोर अनावश्यक रांगा लावण्याची गरज नाही. ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुरू असून नागरिकांना आवश्यक तेवढे सिलेंडर मिळत आहेत.
विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, नागरिकांमध्ये भीती आणि घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न देशासाठी घातक आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच नागरिकांनी विश्वास ठेवावा.








