नागपूर : मागील काही महिन्यांपासून देशभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेला सुरूंग लावण्याचे प्रकार चिंतेचा विषय ठरत आहेत. यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘गरुडदृष्टी’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
नागपूरमधील तरुण तंत्रज्ञांच्या कल्पकतेतून आणि पोलिसांच्या पुढाकारातून साकारलेली ही प्रणाली सध्या सायबर गुन्हेगारीविरोधात प्रभावी अस्त्र ठरत आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि भडकावू पोस्ट व्हायरल होण्याआधीच त्या टिपून हटवण्याची क्षमता ‘गरुडदृष्टी’मध्ये आहे.
सायबर हॅकेथॉनचा यशस्वी परिणाम-
नागपूर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी ‘सायबर हॅकेथॉन’चे आयोजन केले होते. या हॅकेथॉनमध्ये सायबर सुरक्षेवर काम करणाऱ्या विविध संघांनी भाग घेतला होता. त्यातूनच ‘गरुडदृष्टी’ या प्रणालीची संकल्पना आकाराला आली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि यंत्र शिक्षण (Machine Learning) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
200 हून अधिक गुन्हे टळले-
“‘गरुडदृष्टी’च्या माध्यमातून मागील तीन महिन्यांत 200 हून अधिक सायबर गुन्ह्यांना वेळेत आळा घालण्यात यश आले आहे,” अशी माहिती नागपूर सायबर सेलचे डीसीपी लोहित मतानी यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलताना दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, “ही प्रणाली फेसबुक, इन्स्टाग्राम, X (पूर्वीचे ट्विटर) अशा प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर २४ तास नजर ठेवते. संशयास्पद मजकूर, फेक न्यूज, द्वेषजनक भाषण किंवा कोणताही कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा कंटेंट लगेच ओळखला जातो आणि संबंधित यंत्रणेला सतर्क केले जाते.”
नागपूर शहर बनतेय डिजिटल सुरक्षा मॉडेल-
नागपूर पोलिसांची ही पावले केवळ शहरापुरतीच मर्यादित राहिली नसून, ही प्रणाली राज्यातील इतर शहरांनाही मार्गदर्शक ठरत आहे. ‘गरुडदृष्टी’मुळे नागपूर शहर डिजिटल पातळीवर सुरक्षेचे एक मॉडेल ठरत आहे.
नागरिकांचा सहभाग गरजेचा-
पोलिसांकडून असेही आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहावे आणि संशयास्पद पोस्ट किंवा लिंक दिसल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.
‘गरुडदृष्टी’सारख्या उपक्रमांमुळे सायबर गुन्हे रोखण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते, असे चित्र सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे.