
नागपूर : नागपूरहून एअर इंडियाने बंद केलेल्या किंवा कमी केलेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपूर–मुंबई मार्गावरील विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची विनंती केली आहे.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) चे अध्यक्ष आशीष काळे यांनी यासंदर्भात मांडलेल्या मागणीला गडकरी यांनी पाठिंबा दर्शवत नागपूरच्या वाढत्या औद्योगिक आणि आर्थिक महत्त्वाचा उल्लेख केला आहे. शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती गुंतवणूक लक्षात घेता हवाई संपर्कात कोणतीही घट होणे प्रदेशाच्या प्रगतीसाठी अडथळा ठरू शकते, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
नागपूर–मुंबई विमानसेवा कमी झाल्यामुळे व्यावसायिक प्रवास, उद्योग क्षेत्रातील हालचाली, गुंतवणूकदारांचा संपर्क तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंताही गडकरी यांनी व्यक्त केली आहे. मुंबई हे देशाचे प्रमुख आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र असल्याने नागपूरशी सातत्यपूर्ण हवाई संपर्क राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच त्यांनी नागपूरच्या वाढत्या विमान वाहतूक क्षमतेवरही भर दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या कामांमुळे नागपूर भविष्यात देशातील महत्त्वाचे एव्हिएशन आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एआयडीने आपल्या निवेदनातून एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे विदर्भातील उद्योग, गुंतवणूक आणि प्रवासी वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांची बाब मांडली होती. प्रदेशाचा विकासाचा वेग कायम राखण्यासाठी सक्षम आणि नियमित हवाई संपर्क आवश्यक असल्याचे संघटनेने अधोरेखित केले होते.
गडकरी यांनी या विषयात तातडीने लक्ष घातल्याबद्दल एआयडीने त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे विदर्भाच्या संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत एअर इंडिया आणि टाटा समूह लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन नागपूरहून रद्द झालेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करतील, अशी अपेक्षा एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे यांनी व्यक्त केली आहे.







