Published On : Fri, May 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

गडकरींनी ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकात संघाची कार्यपद्धती सहज भाषेत मांडली – सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

Advertisement

नागपूर – “आपल्यावर जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा त्यांच्या महत्त्वाची जाणीव नसते. मात्र, आयुष्याच्या प्रवासात पुढे गेल्यावर त्या संस्कारांचे मोल लक्षात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या याच संस्कारांचे आणि कार्यपद्धतीचे वर्णन नितीन गडकरी यांनी त्यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या नव्या पुस्तकात सहज, सुलभ भाषेत केले आहे,” असे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख श्री. सुनीलजी आंबेकर यांनी केले.

राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन आज नागपूर येथील वनामती सभागृहात पार पडले. यावेळी श्री. सुनील आंबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक श्री. विवेक घळसासी, राजहंस प्रकाशनचे श्री. नरेश सबजीवालेही यावेळी मंचावर उपस्थित होते.

Gold Rate
02 June 2025
Gold 24 KT 96,000/-
Gold 22 KT 89,300/-
Silver/Kg 98,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमात पुस्तकाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यात ज्येष्ठ संपादक लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक, अनिल सोले, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, ‘तरुण भारत’चे प्रबंध संचालक धनंजय बापट, मुखपृष्ठ साकारणारे आर्टिस्ट राजेंद्र क्षिरसागर, कार्यकारी संपादक शैलेश पांडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री आशुतोष अडोणी यांचा समावेश होता.

श्री. सुनील आंबेकर यांनी सांगितले की, “गडकरींनी संघात स्वयंसेवक म्हणून अनुभव घेतला. नंतर विद्यार्थी परिषदेतील कार्यकर्ते म्हणूनही कार्य केले. या प्रवासातून मिळालेल्या अनुभवांना त्यांनी या पुस्तकात सामावून घेतले आहे. सहजता टिकवणे ही मोठी गोष्ट असते आणि गडकरींनी ती यशस्वीरित्या जपली आहे.”

श्री. विवेक घळसासी यांनी नितीन गडकरी यांच्यावर मातोश्री स्व. भानुताई यांचे आणि संघ-विद्यार्थी परिषदेचे संस्कार मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणारे असल्याचे नमूद केले. “गडकरींनी कधीही आपले काम अलौकिक आहे, असा भाव न आणता सातत्याने कार्य केले, हे विशेष महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष अडोणी यांनी केले. अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले, तर राधा ठेंगडी यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

“संघ, विद्यार्थी परिषद आणि आई यांच्यामुळे जीवनात मूल्यांचे शिक्षण मिळाले” – नितीन गडकरी

पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, “माझी आई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषद यांनी माझ्या आयुष्यावर अमीट छाप टाकली. बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, दत्तोपंत ठेंगडी, बाबुराव वैद्य, यशवंतराव केळकर यांचा माझ्या जीवनावर प्रभाव आहे. त्यांच्या सहवासात मिळालेला अनुभव माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. या पुस्तकात स्वयंसेवक म्हणून मिळालेल्या अनुभूती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”

गडकरींनी पुस्तकाच्या निर्मितीचे श्रेय शब्दांकन करणारे श्री. शैलेश पांडे यांना दिले. त्यांनी नमूद केले की, “निर्णय घेण्याचे धाडस आणि समाजाविषयी संवेदनशीलता या गोष्टी माझ्या संस्कारांतूनच निर्माण झाल्या. देशासाठी काहीतरी करण्याची जाणीवही त्यातूनच आली आहे.”

 

Advertisement
Advertisement
Advertisement