Published On : Sat, May 14th, 2022

शेतीच्या वादातून अपहरण करून मारहाण चार आरोपींची निर्दोष सुटका

Advertisement

Nagpur: शेतीच्या वादातून अपहरण करून मारहाण करण्याच्या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. घुगे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

अशोक धापोडकर, मनीराम निखाडे, सुनील कावडकर आणि राजू लिबा कनौजीया अशी सुटका करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोठीराम घुमडे रा. उमरेड यांची उमरेड येथे शेती आहे. ती शेती विकण्यासाठी त्यांनी अशोक रामदास झाडे यांच्या नावाने आममुख्त्यार पत्र करून दिले होते. त्या शेतजमीनीच्या मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार २६ जून २०१४ ला भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी जमीनीची मोजणी करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी आरोपींसोबत शेतीचा वाद सुरू होता. आरोपींनी संगनमताने मोजणीच्या ठिकाणी पोहोचून झाडे यांना मारहाण केली.

त्यानंतर त्यांचे एका कारमधून अपहरण केले. त्यांना एका फार्महाऊसवर नेऊन मारहाण केली व गतप्राण अवस्थेत तसेच सोडून पळून गेले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी अपहरण व गंभीरपणे जखमी करण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सर्व साक्षीदार व दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

आरोपींच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी, ॲड. सौरभ त्रिवेदी, ॲड. रिषभ शुक्ला आणि ॲड. अर्पण लद्दड यांनी काम पाहिले.