नागपूर: शहरातील विविध भागात असलेल्या पाण्यासंबंधित समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, तसेच डेलिगेट्सने दर २-३ दिवसांत लोकप्रतिनीधींची भेट घ्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिले.
मंगळवारी (८ ऑगस्ट) मनपा मुख्यालयात स्थायी समिती सदस्य व ओसीडब्लू अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने स्थायी समिती सदस्य मनोज सांगोळे, संगीता गि-हे, भाग्यश्री कानतोडे, हरीष ग्वालबंशी, जितेंद्र घोडेस्वार, सरला नायक, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड यांच्यासह सर्व झोनच्या डेलिगेट्सची उपस्थिती होती.
शहरातील अनेक भागात पाण्याची पाईपलाईन असूनही टॅंकरने पाणी पुरवठा कऱण्यात येत असल्याचे लोकप्रतिनिधींनी ओसीडब्लू अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. अनेक ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही खोदलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. शहरातील अऩेक भागात पाण्याचा दबाव कमी असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे सांगितले. या सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यात यावा असे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापतींनी दिले.