
नागपूर : आशिष एनएक्स इमारतीतील भीषण आगीनंतर शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर एनओसीशिवाय सुरू असलेल्या इमारतींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, अग्निशमन विभागाकडून स्पष्ट उत्तरे मिळाली नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.
मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते यांनी शहरातील काही इमारतींना फायर एनओसी नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले. मात्र, त्या इमारतींची नावे किंवा त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारणा होताच त्यांनी यावर भाष्य करण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, विभागातील इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावरील माहिती देण्याचा अधिकार केवळ मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडे असल्याचे स्पष्ट केले. परिणामी, माहितीची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे केंद्रित असताना त्यांच्याकडूनच माहिती दिली जात नसल्याने प्रश्न अधिकच गडद झाले आहेत.
फायर एनओसी नसलेल्या इमारतींविरोधात नोटिसा देण्यात आल्या असतील, तर त्या इमारतींची यादी नागरिकांसमोर का ठेवली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अशा इमारतींवर कठोर कारवाई झाली आहे का, याबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
आशिष एनएक्समधील आगीच्या घटनेने शहरातील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबरोबरच प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती लपवली जात असल्याची भावना निर्माण होत असून, या प्रकरणात संबंधित विभागाने स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी होत आहे.
शहरातील फायर एनओसीविना कार्यरत असलेल्या इमारती कोणत्या आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती सार्वजनिक करण्याची अपेक्षा आता नागपूरकर व्यक्त करत आहेत.







