Published On : Wed, Nov 11th, 2020

मास्क न लावणा-या २०५ नागरिकांकडून दंड वसूली

Advertisement

आतापर्यंत १८८०९ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (११ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २०५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १८८०९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ७७,६३,५००/- चा दंड वसूल केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नसताना अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २७, धरमपेठ झोन अंतर्गत ३७, हनुमाननगर झोन अंतर्गत १२, धंतोली झोन अंतर्गत १६, नेहरुनगर झोन अंतर्गत १५, गांधीबाग झोन अंतर्गत १७, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ८, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत २१, मंगळवारी झोन अंतर्गत ३८ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १३३३९ बेजबाबदार नागरिकांकडून रु ६६ लक्ष ६९ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नागारिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.