Published On : Sun, Sep 26th, 2021

वीज वसुली करिता गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Advertisement

आई व मुलांवर गुन्ह दाखल ; कठोर कारवाई साठी महावितरण आक्रमक

नागपूर : वीज बिलाची थकबाकी वसुली साठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर ग्राहकाने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी श्रीमती क्रिष्णा अरुण वाट व त्यांच्या दोन मुलांवर पोलिसांनी भादंवि ३२३,३३२,३३३,३५३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महावितरणच्या वतीने अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी झोनचे पोलीस उपायुक्त नरुल हुसेन यांच्याशी संपर्क करून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महावितरणची थकबाकीदार ग्राहकाकडे वीज वसुलीची मोहीम सुरु आहे. नागपूर शहरातील काँग्रेस नगर विभागातील जयताळा वितरण केंद्र अंतर्गत त्रिमूर्ती नगरातील अमर आशा भांडे लेआऊट येथे वरिष्ठ तंत्रज्ञ सुखदेव केराम वीज ग्राहक श्रीमती क्रिष्णा अरुण वाट यांच्या कडील ५ हजार रुपयांची वीज बिलाची थक्कबाकी वसुली करीता गेले असता वीज ग्राहकाने सुखदेव केराम यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात केराम गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्या डोक्याला आठ टाके पडले असून त्यांची प्रकृती ठीक आहे.नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि काँग्रेस नगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके यांनी सुखदेव केराम यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.

या प्रकरणी सोनेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून त्या आधारावर आरोपी श्रीमती क्रिष्णा अरुण वाट वय ६० वर्षे,, अनिरुद्ध क्रिष्णा वाट (४०)आणि इशांत क्रिष्णा वाट(३५) याच्या विरोधात भादवि कलम ३२३,३३२,३३३,३५३,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे.भादवि कलम ३५३ नुसार शासकीय कामात अडथळा आणणे,माराहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस २ वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते.तर कलाम ३३२ नुसार शासकीय कामकाजात अडथळा आणणे तसेच इजा होईल अशी मारहाण करणे या गुन्ह्यांचा समावेश असून त्याअंतर्गत ३ वर्ष व त्यापेक्षा अधिक अशा शिक्षेची तरतूद आहे. अनेकदा वीज ग्राहक महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावतात, हे कृत्य देखील शिक्षेस पात्र आहे.या प्रकरणी वीज ग्राहकाच्या विरोधात भादवि कलम ५०६ नुसार आरोपीस २ वर्ष कारावासाची तरतुद आहे.काही ठिकाणी वीज ग्राहक झुंडीने महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात.अशा प्रसंगी पोलीस वीज हल्लेखोर ग्राहकावर भादवि कलम१४३,१४७, १४८, १४९ ही दंगलीची कलमे लावतात.विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचे आहेत. या सर्व कलमा अंतर्गत राज्यात अनेकांना शिक्षा झालेली आहे.

थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महावितरणचे कर्मचारी थकबाकीदार ग्राहकाच्या घरी जाऊन त्यांना विज बील भरण्याची विनंती नम्रपणे करीत आहेत. अनेक ठिकाणी ग्राहकही महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहे. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणे अत्यंत निंदनीय घटना असून अशा हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी महावितरण सर्वप्रकारच्या उपाययोजना करील तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेशी महावितरण कटिबद्ध आहे. त्यामुळे वसुली करताना बहुतेक ठिकाणी पोलिसांची मदत घेण्यात येते. महावितरणच्या बिकट परिस्थितीत ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.