Published On : Fri, Jun 1st, 2018

‘बळीराजा’ असंवेदनशील झालाय ?, कृषिमंत्र्यांना दिली ‘ही’ श्रद्धांजली !

Advertisement

नागपूर: राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या त्यांच्या मूळगावी शुक्रवारी होणाऱ्या अंत्यविधीसाठी नातेवाईक, त्यांचे चाहते, मुख्यमंत्री व सरकारमधील नेते मंत्रीगण उपस्थित राहतील. शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या हितासाठी फुंडकर यांनी आपले आयुष्य वेचले. विरोधी पक्षात असताना केलेली आंदोलने असोत किंवा भाजप सत्तेत आल्यावर २०१६ साली कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्यावर बळीराजाच्या कल्याणासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीवर दिलेला भर असो. पांडुरंग फुंडकर नेहमीच आपल्या मातीशी एकनिष्ठ राहिले, अखेरच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिले.

परंतु खेदाची बाब म्हणजे याच शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आजपासून बुलडाणा जिल्ह्यात बंदचे हत्यार उपसले आहे. आपल्या काळजीवाहू नेत्याच्या दुःखद निधनानंतर आज त्यांचा अंत्यविधी असताना शेतकऱ्यांनी थोडी संवेदनशीलता दाखविताना मोठ्या मनाने हे आंदोलन पुढे ढकलायला हवे होते.

पिकांसाठी हमीभाव व इतर मागण्या हा शेतकऱ्यांचा न्याय हक्क असला तरीही माणुसकीच्या नात्याने सौजन्य दाखवून किमान आजच्या दिवशी ‘बंद’ पुकारला नसता तर ती कर्तव्यनिष्ठ कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना खरी श्रद्धांजली ठरली असती.

—By Narendra Puri & Swapnil Bhogekar