मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने पेपरफुटी होण्यापूर्वीच आरोपींना अटक करून मोठा गैरप्रकार रोखल्याचा दावा करत फडणवीस यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःहून तपास करत पेपरफुटीच्या कटाचा पर्दाफाश केला आणि संबंधित आरोपींना परीक्षा होण्यापूर्वीच अटक केली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई पेपरफुटीनंतर नव्हे, तर त्याआधी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “राहुल गांधींनी केलेले ट्विट देशातून केले की परदेशातून, हे मला माहीत नाही. ते अनेकदा परदेशात असतात, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील घडामोडींची संपूर्ण माहिती नसावी.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगार असून, त्यांच्या अटकेमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यांतील संभाव्य पेपरफुटीचे प्रकारही रोखण्यात मदत झाली आहे.
यावेळी राहुल गांधींनी राज्य सरकारवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाच्या कारभाराचाही आढावा घ्यावा, असा सल्लाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे.





