पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर भक्तिरसात न्हालेल्या पंढरपूर नगरीत शनिवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता पारंपरिक विधीनुसार विठुरायाची महापूजा करण्यात आली. लाखो वारकऱ्यांच्या “विठ्ठल… विठ्ठल…” जयघोषाने संपूर्ण पंढरी दुमदुमून गेली.
यंदाच्या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील वारकरी दांपत्य बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने यांना मिळाला. महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी राज्यातील शेतकऱ्यांचे सुख, समाधानकारक पाऊस, तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भावपूर्ण प्रार्थना केली.
पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला विशेष पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला. त्यानंतर श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची आरतीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, महापूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले, तर व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवून वारकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले.
या सोहळ्याला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार गोरे, गिरीश महाजन, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, यंदाच्या वारीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ उपक्रमांमुळे तब्बल ३५ लाख वारकऱ्यांसाठी स्वच्छता, आरोग्य आणि निवाऱ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले. या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या डॉक्टर, स्वयंसेवक आणि स्वच्छतादूतांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.




