
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मोठी घोषणा होत असताना नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा मात्र अद्याप कायम असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल गुडधे यांच्या नावाची घोषणा झाली असली, तरी ग्रामीण अध्यक्षपदाची घोषणा रखडल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड झाल्याचे चित्र दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटाकडून आशिष बैस यांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग करण्यात आले. दुसरीकडे, माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि आमदार विकास ठाकरे यांच्याशी जवळीक असलेल्या गटाकडून केदार वासनिक यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याची चर्चा आहे. या दोन गटांतील मतभेदांमुळेच नागपूर ग्रामीण अध्यक्षपदाची घोषणा अखेरच्या क्षणी थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्यभर जिल्हा काँग्रेस कमिटींच्या पुनर्रचनेला मंजुरी देत संघटन मजबूत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. “संगठन सृजन अभियान” अंतर्गत निरीक्षकांनी जिल्हानिहाय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करून अहवाल सादर केले होते. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल गुडधे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर संघटनेत नव्या नेतृत्वाची चर्चा रंगली आहे. बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे, तरुण कार्यकर्त्यांना संधी देणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्ष यंत्रणा सज्ज करणे यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र दुसरीकडे, नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील संघटन मजबूत करण्याऐवजी गटबाजीचाच प्रभाव वाढत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
आता दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्व या वादावर काय तोडगा काढते आणि नागपूर ग्रामीण काँग्रेसची धुरा अखेर कुणाकडे जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








