
चंद्रपूर : राज्यात वारंवार होणाऱ्या निवडणुका आणि त्यानिमित्ताने लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याची तीव्र नाराजी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री Sudhir Mungantiwar यांनी व्यक्त केली आहे. वर्षभर कोणत्या ना कोणत्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू राहत असेल, तर विकासकामे पूर्ण कशी होणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुनगंटीवार म्हणाले की, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद अशा विविध निवडणुकांच्या प्रक्रियेमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष विकासकामांपेक्षा निवडणुकांकडे अधिक केंद्रित होते. याचा थेट परिणाम जनतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांवर आणि योजनांवर होत आहे. लोकशाहीत निवडणुका आवश्यक असल्या तरी विकासकामांनाही तेवढेच महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसताना इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे म्हणजे ग्रामीण जनतेवर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले. ग्रामीण भागातील अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना निवडणुकांना प्राधान्य देणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीच्या विद्यमान पद्धतीवर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले की, ज्यांना आमदार व्हायचे आहे त्यांनी थेट जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवावी. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीपेक्षा थेट जनमताच्या आधारे प्रतिनिधींची निवड झाल्यास लोकशाही अधिक मजबूत होईल.
निवडणूक व्यवस्था, वारंवार लागू होणारी आचारसंहिता, त्यावरील खर्च आणि प्रशासनावर पडणारा ताण यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण व्यवस्थेत व्यापक सुधारणांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील निवडणूक व्यवस्था, आचारसंहिता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नव्याने राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







