पक्षामुळेच आपणा सर्वांचे अस्तित्व : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

नैवेद्यम इस्टेरिया सभागृहात दीड हजारावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

नागपूर: भारतीय जनता पक्षामुळेच माझे आणि आपणा सर्व कार्यकर्त्यांचे अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांनी कमळ चिन्हावरील उमेदवारालाच मतदान करायचे आहे. एक चूक झाली तर 5 वर्षे खराब झाल्याशिवाय राहणार नाही. मी जरी निवडणूक लढवीत नसलो तरी मी कामठी मतदारसंघातच राहणार आहे, हा मतदारसंघ मी कामे करण्यासाठी दत्तक घेतला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कळमना येथील नैवेद्यम इस्टेरिया या सभागृहात दीड हजारावर बुथप्रमुख, पेजप्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेनंतर बावनकुळे यांची ही पहिलीच बैठक होय. या बैठकीला अनिल निधान, माजी जि.प.सदस्य रूपराव शिंगणे, माजी पंस सभापती अजय बोढारे, मनीष वाजपेयी, अरविंद गजभिये, संजय टेकाडे, उमेदवार टेकचंद सावरकर, सदानंद निमकर, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, रमेश चिकटे, निशा सावरकर, मनोज सहारे, संकेत बावनकुळे, विवेक मंगतानी, अशोक हटवार, राजेश रंगारी, अजय कदम आदी उपस्थित होत.

कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती असलेल्या या सभागृहात बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- मला कमळ मिळाले होते म्हणून मी जि.प.सदस्य, आमदार, पालकमंत्री व ऊर्जामंत्री होऊ शकलो. या मतदारसंघातून मी जाणार नाही. दररोज या मतदारसंघात माझे दौरे राहणार आहेत. लोकांची कामे करणार आहे. या मतदारसंघातील दीड लाख परिवारांशी माझे थेट संबंध आहेत. येत्या 24 तारखेला महायुतीच्या 220 जागा निवडून येणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सन 2004 मध्ये काँग्रेसकडून खेचून आणलेला हा मतदारसंघ आहे. तेव्हापासून या मतदारसंघात कार्यकर्त्यांमुळेच कमल फुलत आहे. मी पूर्णवेळ दौरा करणार आहे. पक्षाने आता मला 32 मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे, असे सांगून पालकमंत्री बावनकुळे यांनी आपल्या राजकीय जीवनाचा घटनाक्रम कार्यर्त्यांसमोर ठेवला. मी कधीही उमेदवारी मागितली नव्हती. तसेच सावरकर, बोढारे, निधान यांनीही मागितली नव्हती. कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकदीने प्रचार सुरु करावा आणि हा मतदारसंघ पुन्हा भाजपाकडेच राहील यासाठी झटावे, असे आवाहनही पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

या बैठकीत अनिल निधान, अजय बोढारे, रूपराव शिंगणे यांनीही मार्गदर्शन केले. टेकचंद सावरकर यांचेही यावेळी भाषण झाले.