
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा प्राथमिक आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येणार असून त्यानंतर पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीत पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात परिस्थितीचे मूल्यमापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून तीन याद्या तयार झाल्या आहेत. उर्वरित याद्यांचे कामही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, चारा आणि वीज उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. चाऱ्याची लागवड आधीच करण्यात आली असून ज्या भागात टंचाई जाणवेल, तिथे चारा पुरवला जाईल. सायंकाळच्या वेळेत शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, काही ठिकाणी सिंगल फेजमुळे बंद असलेला वीजपुरवठाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या भागात विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, तिथे पिके वाचवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच पाणी उपलब्ध असलेल्या भागात रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असला तरी मराठवाड्यातील लहान धरणांमध्ये पाणी कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्यात आला आहे. शेतकरी अडचणीत असताना राजकारण न करता सर्वांनी मिळून मदत करावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.




