Published On : Wed, Oct 14th, 2020

मास्कला शत्रू समजू नका, कोरोनावर विजय दूर नाही!

Advertisement

कोव्हिड संवाद : कोरोनासंदर्भात घ्यावयाची काळजी विषयावर डॉ. हरकरे, डॉ. मनोहर यांचे मार्गदर्शन

नागपूर : कोरोनावर लस यायला आणि ती सर्वांना उपलब्ध व्हायला वेळ लागेल. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग हाच त्याचावरील सद्यपरिस्थितीत एकमेव उपाय आहे. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, नागरिक असा सर्वांनी मिळून एकत्रित लढा द्यायचा आहे. हा एकत्रित लढा सुरू असल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मास्कला शत्रू समजू नका. यामुळेच कोरोनावरील विजय आता दूर नाही, असा संदेश ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून बुधवारी (ता. १४) डॉक्टरांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात आज एनकेपी साळवे इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस आणि लता मंगेशकर हॉस्पीटल येथील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. विवेक हरकरे आणि मेडिसीन विभागातील प्रा. डॉ. तनुजा मनोहर यांनी ‘कोव्हिड संदर्भात घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. डॉ. विवेक हरकरे म्हणाले, रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना लक्षणे नसली तर त्यांनी घाबरून जायचे काहीही कारण नाही.

होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध आहे. होम आयसोलेशनमध्ये असताना स्वतंत्र खोलीत रुग्णाने असावे. घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात त्यांनी येऊ नये. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोशिएशनने एक मार्गदर्शक पुस्तिका काढली आहे. जी आय.एम.ए. मध्ये नि:शुल्क उपलब्ध आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून कोव्हिड केअर सेंटरची व्यवस्था आहे. जर घर लहान असेल तर त्याचा उपयोग आयसोलेशनसाठी रुग्ण घेऊ शकतात. अन्य व्यवस्थाही प्रशासनाने करून ठेवल्या आहेत. त्याचाही लाभ नागरिकांना घेता येतो.

डॉ. तनुजा मनोहर म्हणाल्या, कोव्हिडचा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असला म्हणजे कोणाशी बोलायचेच नाही, असे नाही. रुग्णांशी सतत सकारात्मक बोलत राहणे, हे सुद्धा आवश्यक आहे. फक्त सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर अत्यंत आवश्यक आहे. या काळात सकारात्मकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टी बघणे टाळा. मानसिकता चांगली ठेवली तर या रोगावर लवकर मात करता येते. कोव्हिडवर लस उपलब्ध व्हावी यासाठी संपूर्ण जग कामाला लागले आहे. ती जरी आली तरी भारतासारख्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर ती लवकर उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे. किमान पुढील एक वर्ष तरी आपली मास्कपासून सुटका नाही. त्यामुळे काळजी घ्या. नियम पाळा, कोरोनावर संघटित विजय मिळवा, असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला.