नागपूर : समाजातील अंध, गरीब, शोषित, पिडीत तसेच दिवांग्य व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या समाजिक संस्थांनी समर्पित भावनेने कार्य करावे यासाठी समाजानेही अशा संस्थांना मदत करावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये गौरव निधी समर्पण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी राज्यातील विविध सेवाभावी संस्थांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरव समर्पण निधीचे वाटप करण्यात आले.
व्यासपीठावर खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदार सर्वश्री डी. मल्लिकार्जून रेड्डी, प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, गिरीष व्यास, कृष्णा खोपडे, संदीप जोशी, डॉ. राजीव पोत्तदार उपस्थित होते.
समाजामध्ये अनेक समस्या आहेत. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. तसेच मेळघाटामध्ये महिला व बाल आरोग्यासाठी कार्याची गरज आहे. त्याचप्रमाणे अंध, अपंग, गरीब, वृद्ध, महिला पिडीत व्यक्ती यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व घटकांचा उत्थानासाठी तसेच यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध सेवाभावी संस्था, कार्य करीत आहेत. या संस्थांना मदत म्हणून गौरव निधी समर्पण सोहळ्याचे आयोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक दायित्व, जबाबदारी व सामाजिक जागरुकतेच्या जाणिवनेने आधार नसलेल्या सेवाभावी संस्थांना या निधीमधून सहाय्य करण्यात आले आहे. पैशांपेक्षा प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या माणसांचे महत्व अधिक असून अशी प्रामाणिक माणसे समाजसेवेचे कार्य करीत आहे. असे सांगून नितीन गडकरी यांनी या सेवाभावी संस्थांना निरपेक्ष भावनेने मदत करावी. तसेच सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा झालेला एक कोटी रुपयांचा निधी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करणाऱ्या संस्थांना गौरवनिधी समर्पण सोहळ्याच्या माध्यमातून या निधीचे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रा. अनिल सोले यांनी तर संचालन बाळ कुळकर्णी व आभार डॉ.राजीव पोत्तदार यांनी केले. यावेळी राज्यातील विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व संस्थापक उपस्थित होते.