Published On : Fri, Sep 22nd, 2017

देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

Advertisement

नागपूर : बालमनावर स्वच्छतेचे संस्कार बिंबविण्यासाठी त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी पालकांसह शिक्षकही मोठया प्रमाणात प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांची मनधरणीही केली जाते. पण नागपूरजिल्हयातील 80 हजार बाल मतदारांनी राज्यात प्रथमच स्वच्छतेसाठी एकाच दिवशी मतदान करुन मोठयांना स्वच्छतेचा संदेश दिलाच सोबत देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी बाल मतदार म्हणून आपला सहभागहीनोंदविला आहे.

विद्यार्थांनी मतदानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा विषय मांडल्याचे राज्यातील ही प्रथमच व अभूतपूर्व घटना आहे. बालमतदारांनी नोंदविलेल्या मतांमुळे मोठयांसह भावी पिढीलाही स्वच्छतेचा विचार करणे भागपडेल व पर्यायी त्याचा स्वीकार करणे क्रमप्राप्त ठरेल. जिल्हयात एकाच वेळी बालमतदारांनी स्वच्छतेविषयक नोंदविलेले मत नक्कीच भविष्यातील स्वच्छ, सुंदर देशाची नांदी ठरणार आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नागपूर जिल्हयात दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत “स्वच्छता ही सेवा” अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानाच्या निमीत्ताने नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यांनतर त्याचे सातत्य टिकविण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती ,शिक्षण व संवाद उपक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्या सहाय्याने जिल्हयातील 1562 शाळांमध्ये 80 हजार विद्यार्थांनी एकाच दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंतस्वच्छता मतदानाचा आपला हक्क बजावला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ईयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.

यावेळी, शिक्षकांसोबतच पालक आणि विद्यार्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. इतर मतदानाप्रमाणेच स्वच्छता विषयक मतदार पत्रिका तयार करण्यात आल्या होत्या. केंद्रनिहाय शाळांमध्ये मतदानपत्रीकेचे वितरण करण्यात आले. मतदान पत्रीकेत चित्रांच्या माध्यमातून होय किंवा नाही सारख्या प्रश्नांना लिखीत स्वरुपात उत्तरे देवून विद्यार्थांनी ती मतपत्रिका मतदानपेटीत टाकल्या. यावेळी, शिक्षकांनी वर्गनिहायविद्यार्थांच्या यादयाही तयार केलेल्या होत्या. मतदानासाठी विद्यार्थी सकाळपासूनच उत्सुकतेने रांगेत उभे होते. जिवनात प्रथमच मतदान करीत असल्याचा उत्साह व नवचैतन्य विद्यार्थांमध्ये संचारले होते. मतदानाचाहक्क बजावल्यानंतर विद्यार्थी एकमेकांना मतदान केल्याची खुण आत्मविश्वसाने दाखवत होते.

शालेय विद्यार्थांना स्वच्छता व आरोग्य विषयक चांगल्या सवयी लावण्यासाठी त्याच प्रमाणे स्वच्छतेविषयी मुलांची समज आणी मत जाणून घेण्यासाठी स्वच्छता विषयक मतदान महत्वपूर्ण भूमिका बजावते. यामतदानामुळे विद्यार्थांच्या मानसिक व सामाजीक दृष्टिकोणाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न या निमीत्ताने झाला आहे. विद्यार्थी अर्थातच देशाचा भावी नागरिक म्हणूनही बालकांना मतदानासारख्या महत्वपूर्ण प्रक्रियेतसामावून घेण्यासाठी व स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालमतदारांच्या माध्यमातून स्वच्छतेसारखा विषय वर्तमान समाजाला उपयुक्त व दिशादर्शक ठरणारा आहे.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी विशेष प्रयत्न करुन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर मतदानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाला एकाच दिवशी जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये मोठया प्रमाणात यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी शाळांचे मुख्याद्यापक व शिक्षकांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.