Published On : Wed, Jul 18th, 2018

मराठा समाजाचा अंत बघू नका –धनंजय मुंडे

Advertisement

नागपूर : मराठा तरुणांनी ४ वर्षे संयम दाखवला आहे. संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. आत्ता त्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका. त्यांचा अंत बघू नका. या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर तरुणांना दोष देवू नका असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला. नियम २८९ अन्वये मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडताना सरकारने मराठा समाजाला कसे फसवले आहे आणि फसवत आहे याची माहिती दिली.

मराठा समाजाने राज्यात आत्तापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ मोर्चे काढले आहेत.आज परळी येथे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून आत्ता २३ जुलैला आषाढी एकादशीच्यादिवशी आंदोलन केले जाणार आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणा संदर्भात राज्यात 57 मुक मोर्चे निघूनही निर्णय झाला नाही. आता हे मोर्चे तालुक्या तालुक्यात निघत आहेत. मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका , मराठा आरक्षण निर्णय तातडीने घ्या अशी मागणी त्यांनी केली.

या प्रश्नावर आमदार सुनील तटकरे, आमदार भाई जगताप, आमदार संजय दत्त, आमदार नरेंद्र पाटील यांनी मत व्यक्त केले आरक्षण न देणा-या सरकारचा विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणा देत धिक्कार केला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटे तहकूब करण्यात आले . या विषयावर चर्चेसाठी वेळ देण्याचे आश्वासन सभापती यांनी दिले.