Published On : Thu, Oct 5th, 2017

किटकनाशके फवारतांना काळजी घ्या जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

Advertisement

नागपूर : शेतातील कापूस सोयाबीनसह इतर सर्व पिकांवर किटकनाशके तसेच तणनाशकासह विविध रासायनिक औषधांची फवारणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

शेतातील पिकांवर औषध फवारणी करताना रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. तसेच त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्याद्वारे परिणाम होत असल्यामुळे फवारणी करताना शेतकरी बाधवांनी आवश्यक काळजी घ्यावी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच आवश्यकता असेल तरच संपूर्ण काळजी घेवून फवारणी करावी. असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आवाहन केले आहे.

शेतात किटकनाशकांचे फवारणी करताना संरक्षक कपड्यांचाच वापर करावा तसेच फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावे, फवारणी करताना किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा श्वास घेणे टाळावे, फवारणी मिश्रण हाताने न ढवळताना लांब काठीचा वापर करावा, फवारणी करताना तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे तसेच उपाशीपोटी फवारणी करु नये, फवारणी करताना नजर बंद पडल्यास तोंडाने स्वच्छ करू नये किंवा धुंकू नये तसेच फवारणीचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये, किटनाशके अंगावर पडू नये म्हणून वाऱ्याच्याविरुद्ध दिशेने फवारणी करावी तसेच किटनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह असलेली औषधी सर्वात अधिक विषारी असून, त्याचा वापर नियमितपणे टाळावा.

फवारणी करताना अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, घाम येणे, अंधूक दिसणे, उलटी येणे किंवा मळमळ होणे त्यासोबतच डोकेदुखी अस्वस्थ होणे छातीत दुखणे आदी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ औषधोपचारासाठी आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन घ्यावी. व डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण औषधोपचार पूर्ण करावा.

विषबाधेनंतर तातडीने प्रथमोपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी किटकनाशके डोळ्यात उडाल्यास तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने पाच मिनिटांपर्यंत पाण्याच्या धारेवर धुवा. शरीरावर उडाले असल्यास दहा मिनिटे साबणाने स्वच्छ करुन तात्काळ दवाखान्यात जावून उपचार करावा. विषारी औषध कपड्यावर उडाले असता ते कपडे लगेच बदलण्यात यावे व त्यांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करुन द्यावा. असेही आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.