नागपूर: कोरोना विष्णूचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन असताना नागरिकांना अखण्डित वीज पुरवठ्यासोबतच महावितरणकडून गरजू आणि गरिबांसाठी दातृत्वाचा हात समोर करण्यात आला आहे. महावितरणच्या कामठी उपविभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून शहरातील सुमारे ३०० गरजूना अन्न- धान्य वाटप करून आपल्या सामाजिक भावनेचा परिचय करून दिला.
मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी यासाठी पुढाकार घेतला. महावितरणच्या ड्रॅगन पॅलेस वीज उपकेंद्रात कामठी शहरातील गरजू व्यक्तींना एकत्रित करण्यात आले. मदत वाटप करतेवेळी “सोशल डिस्टन्स” पद्धतीचा पूर्णपणे अवलंब करण्यात आला. यात आटा, तांदूळ. डाळ. तेल,साबण आदी वस्तूंचा समावेश आहे.
नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यासाठी सहायक अभियंता यशवंत भैसारे, नितीन घुबे, विभव नासरे, अमोल भांडेवार, मनोज मानमोडे यांच्यासह महावितरण कामठी उपविभागातील जनमित्र, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.