नागपूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि न्यायालयाच्या अखत्यारीत असून, चौकशी निष्पक्षपणे होईल. तपासातून अखेर ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल आणि सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवरही सरकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील १८ जिल्ह्यांचा आढावा घेऊन तयार करण्यात आलेला सविस्तर अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला जाणार आहे. या अहवालावर चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर बावनकुळेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळणे आवश्यक असून, त्यासाठी समान नागरी कायदा गरजेचा आहे, असे ते म्हणाले. UCC राजकीय फायद्यासाठी आणला जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे बावनकुळेंनी स्वागत केले. काँग्रेसच्या धोरणांवर टीका करत राजस्थानच्या जनतेने विकासाच्या राजकारणाला पसंती दिल्याचा दावा त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे कूच करण्याबाबत विचारले असता बावनकुळेंनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.




