
नागपूर -धामणगाव परिसरात लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण गाव अक्षरशः हादरवून सोडले आहे. या आगीत अनेक घरे, दुकाने आणि जनावरे जळून खाक झाली असून, अनेक कुटुंबांचे संपूर्ण आयुष्य काही क्षणांत उद्ध्वस्त झाले आहे. सर्वत्र राख, अश्रू आणि वेदनांचा डोंगर उभा राहिला आहे.
या दुर्घटनेत कमलाबाई हरी रामटेके, कृष्णाजी रंगारी यांसारख्या अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कृष्णाजी रंगारी यांचे जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. घरातील मिरची यंत्र, रोटावेटर, संपूर्ण घरगुती वस्तू तसेच दहा कट्टे गहू आगीत जळून खाक झाले. तरीही, धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या नावाचा प्रशासनाच्या मदत यादीत समावेशच करण्यात आलेला नाही.
आगीमुळे बाधित झालेल्या अनेक कुटुंबांनी आयुष्यभराची कमाई काही क्षणांत गमावली आहे. घरातील संसारोपयोगी वस्तू, कागदपत्रे, धान्यसाठा आणि आर्थिक साठवण पूर्णपणे नष्ट झाली असून अनेक कुटुंबे आजही उघड्यावर जीवन जगत आहेत. काहींना दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून १६ कुटुंबांना सुमारे ४० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मात्र, या मदत वाटप प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक बाधित कुटुंबांचा आरोप आहे की, ज्यांचे प्रत्यक्षात मोठे नुकसान झाले आहे, त्यांची नावे मदत यादीतून वगळण्यात आली आहेत.
मदतीचे निकष काय होते? कोणत्या आधारे निवड झाली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या कुटुंबांकडे दुर्लक्ष का झाले? असे प्रश्न आता गावभर संताप निर्माण करत आहेत. पीडितांचे म्हणणे आहे की, “नुकसान सर्वांचेच समान आहे, मग मदत मात्र काही निवडक लोकांनाच का?”
या अन्यायकारक वाटपामुळे बाधितांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, मदत यादीचा तातडीने फेरआढावा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आग विझली असली तरी धामणगावमध्ये न्यायाची आग मात्र अजूनही धगधगत आहे. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत ही वेदना शांत होण्याची चिन्हे नाहीत.








