Published On : Thu, Nov 7th, 2019

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Advertisement

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून चौदा दिवस उलटले आहेत मात्र अद्यापही राज्यात नवं सरकार स्थापन झालेली नाहीये. त्यातच आता देवेंद्र फडणवीस उद्या (८ नोव्हेंबर) आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर रोजी १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल.

विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजेच १०५ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीमधील शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात गेल्या आहेत. शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. परिणामी सत्ता संघर्ष आणखी वाढला आहे.

गुरुवारी भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. तर तिकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं सांगण्यात आलं. तसेच मुख्यमंत्रिपदावर चर्चा करणार असाल तरच चर्चा होईल असंही शिवसेनेने सांगितलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवलं आहे. तर भाजपनेही आपल्या १०५ आमदरांना आणि समर्धन देणाऱ्या आमदारांना मुंबईत तातडीने बोलावलं आहे. त्यामुळे आता शुक्रवारी नेमक्या काय घडामोडी होतात हे पहावं लागेल.