
नागपूर : नागपूर ते मुंबई दरम्यान हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रविवारी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दोन महत्त्वाच्या उड्डाणांना नियोजित वेळेपेक्षा तासभराहून अधिक उशीर झाला. तांत्रिक कारणे आणि परिचालनातील अडचणींमुळे उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एअर इंडियाची मुंबईहून नागपूरकडे येणारी रात्रीची एआय 2583 ही फ्लाइट सुमारे दीड तास उशिराने उड्डाण झाली. नियोजित वेळेनुसार रात्री 9.35 वाजता नागपूरात पोहोचणारे हे विमान प्रत्यक्षात 10.50 नंतर दाखल झाले.
तसेच नागपूरहून रात्री 10.10 वाजता मुंबईकडे जाणारी एआय 2584 ही फ्लाइटही सुमारे एका तासाने उशिराने निघाली. या उड्डाणांना मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याने अचानक झालेल्या बदलाचा फटका अनेकांना बसला.
दरम्यान, या प्रमुख उड्डाणांव्यतिरिक्त नागपूरहून सुटणाऱ्या इतर काही फ्लाइट्सनाही 10 ते 20 मिनिटांचा विलंब झाला. एअरलाईन्सकडून प्रवाशांना विलंबाची माहिती देण्यात आली असली, तरी ऐनवेळी झालेल्या बदलामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.









