
बीड : जिल्ह्यातील वैतागवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशोक महादेव डिसले असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, कांद्याला मिळत नसलेला दर, वाढते कर्ज आणि मराठा आरक्षण आंदोलनातील दाखल गुन्ह्यांमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
माहितीनुसार, अशोक डिसले यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले होते. त्यातच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे न घेतल्याने कोर्टकचेरीच्या फेऱ्या आणि मानसिक तणाव वाढत गेला. या सर्व विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सरकारने आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत शासनाकडून स्पष्ट निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.
याबाबत प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले की, आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक तरुणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अनेक जण मानसिक तणावाखाली जीवन जगत असून सरकारने तातडीने हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.








