नागपूर – नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रात्री ११ नंतर हॉटेल, ढाबे, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि इतर व्यावसायिक आस्थापने पोलिसांकडून जबरदस्तीने बंद करण्यात येत असल्याच्या पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) दीपक अग्रवाल (आयपीएस) यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी डीसीपी अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, पोलिसांचा उद्देश कोणाचाही कायदेशीर व्यवसाय बंद करणे नसून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा आहे.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या कामकाजासाठी नियमानुसार वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. आवश्यक परवाने आणि वैध परवानगी असलेली आस्थापने नियमानुसार निश्चित वेळेपर्यंत व्यवसाय करू शकतात. काही श्रेणीतील आस्थापनांना उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचीही कायदेशीर परवानगी आहे.
डीसीपी अग्रवाल म्हणाले की, पोलिसांची कारवाई केवळ अशा ठिकाणी केली जाते, जिथे रात्रीच्या वेळी बेकायदा हालचाली, उघड्यावर मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, मारामारी, गोंधळ, संशयास्पद जमाव, लूटमार किंवा इतर गुन्हेगारी प्रकार घडण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी पोलिसांकडून नियमित गस्त आणि विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत.
शहरातील विविध भागांत रात्री उशिरापर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येते. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे, विनाकारण संशयास्पदरीत्या फिरणारे, रस्ते किंवा पदपथांवर बेकायदा व्यवसाय करणारे तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते. आवश्यक परवाने नसलेले किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरही संबंधित कायद्यानुसार कारवाई केली जाते.
डीसीपी अग्रवाल यांनी सांगितले की, गुन्हे प्रतिबंध ही नागपूर पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. चोरी, दरोडे, महिलांविरुद्धचे गुन्हे, अमली पदार्थांचा अवैध व्यापार, टोळीगिरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आणि देखरेख वाढविण्यात आली आहे.
सोशल मीडियावर फिरणारे अनेक संदेश आणि व्हिडिओ दिशाभूल करणारे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर पोलिसांनी कोणताही नवीन निर्बंध लागू केलेला नसून, सर्व कारवाई विद्यमान कायदे आणि नियमांनुसारच केली जात आहे. कोणत्याही व्यापाऱ्यावर किंवा नागरिकावर मनमानी कारवाई केली जात नाही.
नागरिकांनी सोशल मीडियावरील अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच परिसरात बेकायदा मद्यपान, अमली पदार्थांचा वापर, संशयास्पद हालचाली किंवा समाजविघातक कृत्ये आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही डीसीपी दीपक अग्रवाल यांनी केले.
शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करणे, गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करणे हेच नागपूर पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट असून, त्यासाठी गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस आणि इतर विभाग संयुक्तपणे सातत्याने विशेष मोहिमा राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
— रविकांत कांबळे





