Published On : Fri, Jun 19th, 2020

सभागृहात आयुक्तांनी तयार राहावे

Advertisement

सत्ताधाऱ्यांचे आव्हान ः विरोधकांनी अविश्‍वास आणल्यास चर्चा

नागपूर ः राज्य सरकारने सभागृह घेण्याचे स्पष्ट केले असून आतापर्यंत सभेपासून पळ काढणाऱ्या आयुक्तांनी प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरासाठी तयार राहावे, असे आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिले. सत्ताधाऱ्यांचा अविश्‍वास आणण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, मात्र विरोधकांनी स्थगनद्वारे प्रस्ताव आणल्यास जनहिताच्या मुद्‌द्‌यावर अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्‍यता सत्तापक्ष नेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केली.

त्यामुळे उद्या होणाऱ्या महापालिका सभेत आयुक्तविरुद्ध पदाधिकारी, सदस्य असा सामना रंगणार आहे.
महापौरांचे उद्या, 20 जून रोजी प्रस्तावित सभेबाबतचे पत्र आयुक्तांनी राज्य शासनाकडे अभिप्रायासाठी पाठविले.

राज्य सरकारने आज कोव्हिडबाबत नियमाचे पालन करून सभा घेण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले, अशी माहिती देतानाच आयुक्तांचे वर्तन लोकशाहीविरुद्ध असल्याचा घणाघात सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी केला. राज्य सरकारने दिलेल्या अभिप्रायाने लोकप्रतिनिधींचा विजय झाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राज्य सरकारने सभेसाठी परवानगी दिल्यानंतर आयुक्त लोकप्रतिनिधींना त्रास देण्यासाठीच कामे करीत असल्याचे स्पष्ट झाले, असा टोला ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी हाणला. गेल्या तीन महिन्यांतील आयुक्तांची कार्यप्रणाली नियमबाह्य होती, असा आरोप करीत तिवारी यांनी केला.

पितळ उघडे पडण्याच्या भीतीने सभागृहच होऊ द्यायची नाही, अशी आयुक्तांची भूमिका होती. लोकप्रतिनिधीच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी आयुक्तांची कृती आहे. लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याची नियोजनबद्ध पद्धत ते अवलंबवित आहे, असाही आरोप त्यांनी केला.

आतापर्यंत ज्या प्रश्‍नांच्या उत्तरापासून आयुक्त पळ काढत होते, त्याची उत्तरे देण्यासाठी आयुक्तांनी आता तयार राहावे, असे आव्हान त्यांनी दिले. आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या राजकीय ‘गॉडफादर’चा आधार घेऊन शहराचे नुकसान करीत आहे, असा घणाघातही त्यांनी केला. पत्रकारपरिषदेत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे आदी उपस्थित होत्या.

आयुक्तांच्या उत्तराने सारेच अवाक्‌
16 जूनला महापौर संदीप जोशी यांनी गटनेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सभेबाबत आयुक्तांना पत्र दिले. परंतु दोन दिवस त्यांनी उत्तर दिले नाही.

अखेर आज महापौरांच्या मेल’वर त्यांनी उत्तर पाठविले. ‘सभेचा निर्णय तुम्ही घेतला, त्यामुळे तुम्हीच व्यवस्था करा’ असा मेल आयुक्तांनी महापौरांना केल्याबाबत तिवारी यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.