Published On : Thu, Mar 16th, 2023

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग….

संघटना हा तर भारतीय जनता पार्टीचा आत्मा! या आत्म्याचा म्हणजेच ‘आतला आवाज’ ऐकण्याची जबाबदारी खरे तर प्रदेशाध्यक्ष या संघटनात्मक पदावर असते. आजवरच्या प्रत्येक प्रदेशाध्यक्षानी या आवाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसात भाजपाच्या संघटनेचा ‘आतला आवाज’ बुलंद होताना दिसतोय हे मात्र खरं आहे. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत एक व्यक्तिमत्त्व झटताना दिसत आहे…. तहानभूक हरपून सातत्याने महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहे… कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आहे, विश्वास देत आहे… काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणत आहे… कुठे मरगळ आली असली तर ती झटकत त्याची कारणे समजून घेत आहे… प्रेरणा देत आहे आणि प्रसंगी कठोर होत झाडाझडती घेत आहे…

संघटनेला नवचैतन्य देण्यासाठी झटणाऱ्या या भाजपा प्रदेशाध्यक्षांचे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव अलीकडे सातत्याने विरोधी पक्षाच्या टिकेचे लक्ष होताना दिसायला लागले आहे. त्यांच्या कामाची दखल, खरे म्हणजे धास्तीच विरोधकांनी घेतली असे म्हणावे लागेल.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात बेहबतुल्ला शाह यांच्या दर्ग्याच्या दर्शनाचे भांडवल करत औरंगजेबाच्या मजारीवर झुकल्याचे जाहीर करत खोटा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच याची जाणीव झाली होती. त्यांनतर शिक्षक आमदार आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पुण्यातील निवडणूकीतही जाणीवपूर्वक बदनाम करायचा प्रयत्न झाला. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासुन त्यांच्या पक्षाची किती अधोगती झाली ती त्यांनी पहावी असे म्हणत संजय राऊत यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

कारण स्पष्ट होतं. एकीकडे महाराष्ट्रातले विश्वासघातकी ठाकरे सरकार उखडले गेले होते तर त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाली होती. पन्नास खोक्यांची ओरड घालणारे आणि अन्याय झाल्याचे अश्रु ढाळत दारोदार हिंडू लागणारे ठाकरे पिता-पुत्र आता सहानुभूतीचे कार्ड वापरू लागले होते. अशा परिस्थितीत फक्त पहिली रेषा पुसून चालणारे नव्हते, तर आपली रेषा वाढवण्याची गरज होती. नव्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी तिथे लक्ष केंद्रित केले. संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावाती दौरा काढला. कार्यकर्त्यांच्या भावना आणि समस्या समोरासमोर जाणून घेत त्यांच्यात नवचैतन्य भरलं.

हौसला दो किसी की टूटी हुई उम्मीदों को….
सहारा दो किसी के थके हुए कदमों को….
जिद भर दी कार्यकर्ताओं मे जो आँधी में भी दिया जला दे…
जज्बा भरा ऐसा जो संघर्ष को मंजिल से मिला दे….!!

कार्यकर्त्यांशी थेट संपर्कातून पक्ष संघटना आणखीन मजबुत होण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी धडाधड निर्णय घेतले. पत्रव्यवस्था कमी करत एका फोनवर कामे करून घेण्याचा धडाका लावला. कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि समस्या फक्त जाणूनच घेतल्या नाहीत, तर त्यांना मार्गही दिला. विश्वास दिला. याचा परिणाम बऱ्यापैकी सकारात्मक झाला. ठाकरेंच्या रडण्यातून निर्माण झालेल्या भावनिकतेच्या आणि सहानुभूतीच्या लाटेचे डॅमेज कंट्रोल करण्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच यशस्वी झाले. विधानसभेच्या जागांमधले गणित काही वजा काही अधिक झाले. नागपूरच्या जागेवरच्या विजयाचा आनंद आघाडीने आसुरी टिकेने साजरा केला, पण त्याचवेळी कोकणात शिक्षक परिषदेच्या निवडणूकीत पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलवत आघाडीचे नाक कापण्याचे काम भाजपाने फत्ते केले. संघटनात्मक बांधणीचा फायदा भाजपाला इतका प्रचंड झाला, की आघाडीचे, विशेषतः ठाकरे पिता-पुत्रांचे रडूबाई राजकारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून उखडून टाकले गेले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळवले. जवळपास अडीज हजारहुन अधिक ग्रामपंचायती थेट लढतीत भाजपाने जिंकून अव्वल स्थान मिळवले. तर बिनविरोध झालेल्या बऱ्याच ग्रामपंचायती या भाजपाच्याच होत्या. “सौ सोनार की एक लोहार की” असा हा दणका होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या निकालाचे स्वागत करत महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.

टीका आणि टोमणेवाल्या विरोधकांकडे दुर्लक्ष करत बावनकुळे यांच्या कामाचा आवाका आता तर अधिकच वाढत जात आहे. गाठीभेटी आणि बैठकांचा जोर वाढत आहे. पक्षप्रवेशांचा तर धमाकाच चालला आहे. तसेही, राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा महाराष्ट्रातून जात होती, त्याचवेळी दीड हजारांपेक्षा अधिक दिग्गज काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश घेऊन बावनकुळेंनी त्या यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडवलाच होता. गेल्या आठवड्यात अधिवेशन, कार्यकर्ते प्रवेश आणि प्रदेश कार्यालयात भाजपा आमदारांसोबतच्या विभागनिहाय बैठका यातून प्रदेश कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सततची लगबग चाललेली असते. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई-ठाणे-कोकण, विदर्भ विभागाच्या आमदारांसोबत दीर्घबैठका होत आहेत. विरोधक जिथे गद्दारी,खोके याच्यापलीकडे जाताना दिसत नाही, तिथे महाविजय-२०२४ च्या संकल्पपूर्तीसाठी भाजपाची जोरदार पूर्वतयारी चाललेली दिसून येत आहे.

‘न सोउंगा न सोने दुन्गा’ अशा आक्रमक आणि सातत्यपूर्ण कामगिरीने बावनकुळे यांनी राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. भविष्यातला धोका ओळखून विरोधक त्यांना टीकेचे लक्ष्य बनवणार हे तर उघडच आहे. २०२४ चा सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात आला असताना हे तर होणारच. पण विश्वास आणि जिव्हाळ्याने पक्षाशी जोडलेले लाखो कार्यकर्ते ही लढाई लढण्यासाठी सोडाच, तर ती निर्णायकरित्या जिंकण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले दिसत आहेत. आता वेगवेगळ्या विचारधारेचे विरोधक एकत्र येत लढाई लढायला मजबूर झालेत, याचाच अर्थ भाजपाचा लढा मजबूत आहे. आता आघाडीच्या तिघाडीत उमेदवारीवरून बिघाडी होणार हे सरळ दिसत आहे. बेघर होणारे नेते एकमेकांचे पंख कापत राहतील. आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय म्हणे! काँग्रेस ०८, राष्ट्रवादी १९ आणि ठाकरे २१ अशा जागा लढवणार. त्यात ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागांमधून वंचित आघाडी वाटा मागायला बसलाच आहे. भाजपासोबत गेल्या निवडणूकीत या जागा २३ होत्या, त्यात आधीच दोन थेट कापल्या गेल्यात, परत उरलेल्यात वंचित मटकावणार. दुसरीकडे काँग्रेसला मागील निवडणूकीत २५ जागा लढवता आल्या होत्या, त्यात फक्त आठ यावेळी आघाडीने तोंडावर मारल्यात. काय नाना पटोले त्यावर आतून राजी होतील? आता लवकरच काँग्रेसची भाजप-जोडो यात्रा सुरू होईल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रात्रंदिन चाललेल्या युद्धात विजयाची दिशा उजळायची सुरुवात होईल. भाजपासाठी संकल्प हीच सिद्धी असते, महाविजयही त्यासाठी अपवाद नसेल.

जब हौसला बना लिया
उंची उडान का…
फिर देखना फिजुल है
कद आसमान का….

प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात भाजपा महाविजयाची भरारी घेणार यात शंका नाही. हा निव्वळ आशावाद नाही, तर कोशीश करनेवालों की हार नही होती यावरचा विश्वास आहे आणि पक्षवाढीसाठी अहोरात्र जीवतोड मेहनत घेणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्षांना हा शुभेच्छांसह सलाम आहे!!